नाशिक : बदलापूर येथील शाळकरी विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्याने सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बदलापूर येथील शाळेतील चार वर्षीय विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदे या संशयितास अटक केली होती. त्यास २३ सप्टेंबरला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने पोलिसांकडील बंदुक हिसकावून हल्ला केला. प्रतिउत्तरात पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधारी व विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केले. तसेच पोलिसांवरही आरोप झाले. न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केल्याने राज्य शासनाने या याचिकेवर सरकारच्या बाजुने युक्तीवाद करण्यासाठी नाशिकचे ॲड. मिसर यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती केली आहे. एन्काऊंटरमुळे समाजावर काय परिणाम होतो, त्यावेळी पोलिसांची धारणा काय असते, मृताच्या मानवी हक्कांचे सरंक्षण होते का याबाबत अनेक प्रश्न जनहित याचिकेतून उपस्थित केले आहेत. याआधीही ॲड. मिसर यांनी गाजलेल्या, संवेदनशिल प्रकरणांमध्ये सरकारच्या वतीने युक्तीवाद केला आहे. यात मालेगाव ब्लास्ट, झवेरी बाजार ब्लास्ट, अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलींग प्रकरण, महाराष्ट्र सदन घोटाळा, पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपींग प्रकरण, शिखर बँक प्रकरण यांसह कुख्यात गँगस्टर छोटा राजन, रवी पुजारी, इकबाल कासकर यांच्याविरोधातील अनेक खटल्यांमध्ये ॲड. मिसर सरकारच्या बाजुने युक्तीवाद करीत आहेत.
अक्षय शिंदेच्या एन्काउंटर हे संवेदनशील प्रकरण आहे. २००६ नंतर राज्यात पहिलेच एन्काऊंटर झाले आहे. एन्काऊंटर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. सर्व तांत्रिक बाजू तपासून अभ्यास करून सरकारच्या वतीने बाजू मांडली जाईल.
- ॲड. अजय मिसर, विशेष सरकारी वकील.