मनमाड : निवडणुका जवळ आल्या की राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. भाजपला निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानंतर एनआयएची छापेमारी सुरू होते. तपास यंत्रणांनी शनिवारी (दि. ५) छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव शहरात केलेली छापेमारीही त्यासाठीच करण्यात आली आहे. उरीचा हल्ला कुणी व कोणासाठी केला हे आजही कोडे आहे ते अजूनही उलगडलेले नाही. त्यामुळे जनता आता हुशार झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
दानवे रेल्वेने मुंबईला जात असताना काही वेळासाठी मनमाडला थांबले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या उबाठा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाला धावती भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असून महागाई, भ्रष्टाचार, अशांतता, जुमलेबाजी आदींना जनता कंटाळली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
दानवे यांचे संपर्क कार्यालयात आगमन झाल्यावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक, गणेश धात्रक, संतोष बळीद, माधव शेलार, सुधाकर मोरे, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लियाकत शेख, इरफान शेख, विजय मिश्रा, सनी फसाटे, मन्सुरी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.