

येवला : रघुजीबाबा शिंदे नाईक सरदार यांनी येवल्याची स्थापना केली. त्या येवल्याची ओळख ही महाराष्ट्रातील बनारस अशी आहे. विणकरांच्या कलाकुसरीमुळे येवल्याच्या वैभवात भर पडली, तर मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे येवल्याचा सर्वांगीण विकास झाल्याचे कुणीही नाकारू शकत नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. (Deputy Chief Minister Ajit Pawar was speaking at a weavers' gathering at Yewla on the occasion of Jan Samman Yatra)
जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री पवार येवल्यात आले असता, माउली लॉन्स येथे आयोजित विणकर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे उपस्थित होते. पवार म्हणाले, विणकर बांधवांनी येवल्याचे वैभव अधिक वाढवले आहे. पैठणी राजकीय लोकांनीही अधिक जवळ केली असून, निवडणुकीतून काही लोकांनी पैठणी वाटप केल्याच्या चर्चा आहेत. त्या पैठण्या खऱ्या की खोट्या याबद्दल सांगता येणार नाही अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. तसेच विणकरांचे प्रश्न साेडविण्यासाठी अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग विभागामध्ये भरीव तरतूद केली असून, २५ हजार कोटी रुपयांचे वस्त्र धोरण स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त विणकर शांतीलाल, दिगंबर भांडगे, राजेश भांडगे, रमेशसिंग परदेशी, बाळकृष्ण कापसे यांच्यासह इतर विणकरांचा सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.