नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसानग्रस्त | पुढारी

नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसानग्रस्त

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात आज (दि. २६) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात ऐन फुलाऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागा तर पश्चिम भागात काढणीला आलेल्या भात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी स्थितीमुळे चिंतेत असलेला बळीराजा आजच्या वादळी पावसाने हवालदिल झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करत पीक विमा भरपाई व शासकीय नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते रविवारी (दि. २६) दुपारी दोनच्या सुमारास हलकासा शिडकावा होत पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला मात्र पुन्हा पाच वाजताच्या दरम्यान सुसाट वारा व विजेच्या कडकडाटासह दिंडोरी शहरासह मोहाडी खडक सुकेने, पालखेड, खेडगाव, लोखंडे वाडी, जोपुळ, जानोरी, कादवा कारखाना लखमापूर वणी, निगडोळ, पाडे, रासेगाव, ढकांबे आदी सर्व भागात कमी अधिक प्रमाणात जोरदार पाऊस झाला. तिसगाव परिसरात काही ठिकाणी गारा ही झाल्या. पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली. सध्या द्राक्ष पीक फुलोऱ्यात असून डिपिंग थिनिंगची कामे सुरू होती. वादळी वारा व पावसाने मोठ्या प्रमाणात मनी गळ होत नुकसान झाले आहे. तसेच घड कुज ही होण्याची भीती आहे. ढगाळ वातावरण व पाऊस या मुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे , कारले,भोपळे,मिरची आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले.पुढील दोन तीन दिवसात नुकसानीची तीव्रता दिसणार आहे.

ऊस तोडणी कामगारांचे पावसाने मोठे हाल झाले. पावसामुळे कारखान्याचा गळीत हंगाम ही विस्कळीत होण्याची शक्यता आहे.पश्चिम भागात भाताचे नुकसान झाले आहे.अगोदरच परतीचा पाऊस न झालेल्या उत्पादन घटले असताना अवकाळी ने राहिल्या पिकांचेही नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे शासनाने त्वरित सरसकट पंचनामे करत पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकिय नुकसान भरपाई द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी दिला आहे

Back to top button