

नाशिक : दिंडोरीतील भीषण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही मदत मंत्री महाजन यांनी जाहीर केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शुक्रवारी (दि. 3) रात्री भीषण अपघात झाला. स्नेहसंमेलन आटोपून घरी परतणार्या इंदोरे येथील दरगोडे कुटुंबाची कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापनमंत्री महाजन, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ, शिक्षणमंत्री दादा भुसे, आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
मंत्री महाजन यांनी सांगितले की, ज्या विहिरीत कार कोसळली, त्या विहिरीला कठडा नव्हता. त्यामुळे विहीरमालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित विहीर तातडीने बुजवण्यात येणार आहे. धोकेदायक विहिरीसंदर्भात पर्यायी उपाययोजना करण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अशा धोकादायक विहिरींचा सर्व्हे करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
दिंडोरी : दिंडोरीतील शिवाजीनगरमध्ये खासगी क्लासचे स्नेहसंमेलनानंतर घरी परतत असताना शुक्रवारी (दि. 3) रात्री 10 वाजता विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात इंदोरे येथील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला. यात 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शनिवारी सर्व मृतांवर इंदोरे येथे एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिंडोरीतील मविप्र संस्थेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या खासगी क्लासचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून इंदोरे येथील कुटुंब घरी परतत असताना शिवाजीनगर येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत त्यांची कार कोसळली. यात 9 जण मृत्यूमुखी पडले. रात्री घटना घडल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता. क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनाने विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढले. मंत्री नरहरी झिरवळ यांनी विहीर बुजवण्याच्या सूचना दिल्यानुसार प्रशासनातर्फे विहीर बुजवण्यात आली.