

नाशिक ः सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर भागाचा कायापालट करण्यात येणार असून, त्यासाठी 1100 कोटींच्या विकास आराखड्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर रविवारी सादरीकरण करण्यात आले. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश शासनाने ज्याप्रमाणे मेळा प्राधिकरण स्थापन केले होते, त्याच धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठीही लवकरच मेळा प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात आढावा घेतला. यावेळी जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर आदी उपस्थित होते. त्यापूर्वी, सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरचा पाहणी दौरा केला. ते म्हणाले, कुशावर्ताची पाहणी केल्यानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. प्रशासनाने त्र्यंबकसाठी सुमारे अकराशे कोटींचा विकास आराखडा (कॉरिडोर) तयार केला असून, त्याचे सादरीकरण मी पाहिले. हा प्रकल्प दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात सिंहस्थासाठी आवश्यक कामांना प्राधान्य दिले जाईल. यात दर्शनसाठी कॉरिडोर, पार्किंग, शौचालये आणि कुशावर्ताच्या सुधारणांचा समावेश आहे. तसेच, कुंडे आणि मंदिरांचे पुनर्निर्माण आणि साधुग्रामही तयार केले जात आहे. कुशावर्ताच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी तज्ज्ञांनी उपाय सुचवले असून, त्यांची अंमलबजावणी केली जाईल.
सिंहस्थ प्राधिकरण पूर्णतः प्रशासकीय साधू-महंतांकडे धार्मिक व्यवस्थापनाची जबाबदारी असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. सिंहस्थ प्राधिकरण पूर्णतः प्रशासकीय स्वरूपाचे असेल. त्यामध्ये साधूवर्गाला स्थान नसेल. सिंहस्थ महापर्वासाठी नाशिकमध्ये 11 पुलांची उभारणी, विस्तृत रस्ते जाळे, साधुग्रामसाठी भूसंपादन, तसेच घाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारले जात असून, जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. या सर्व विकासकामांसाठी आराखडा तयार केला असून, सिंहस्थपूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सिंहस्थाच्या कामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच नाशिक शहरातील 24 नाल्यांचे पाणी सीव्हेज प्लांटपर्यंत नेण्याची व्यवस्था केली जाईल. यासाठी सुमारे 1000 ते 1200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.