

Satpuda Devgoi Ghat bus accident
नंदुरबार : चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम आमलीबारीजवळील देवगोई घाटात कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार झाले. तर २० हून अधिक जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. ९) सकाळी ११ च्या दरम्यान घडला. जगदीश बहादूरसिंग तडवी (इयत्ता 2 री, रा. निबीपाडा), कपिला जाहागीर राऊत (इयत्ता 7 वी, रा. काठी) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून देण्यात आली. दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावाकडे आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस आज सकाळी अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात आली होती. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन ती अक्कलकुव्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 100 ते 150 फूट दरीत कोसळली.
घसरत गेलेली बस खडकावर आदळल्याने बसचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी दरीत जाऊन मदतकार्य करत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंत स्थानिकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर इतर जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.