

नंदुरबार : राज्य शासनाच्या 'राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान' २०२५-२६ अंतर्गत नंदुरबार जिल्ह्याने प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्याच्या नकाशावर आपला ठसा उमटवला आहे. या मोहिमेत उत्कृष्ट कार्याबद्दल नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि तळोदा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांची राज्यस्तरावरील मानाच्या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ही स्पर्धा राबवण्यात आली होती. यामध्ये प्रशासनातील वेग, सेवा वितरणाची पद्धत, पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन या कठोर निकषांवर जिल्ह्याचे मूल्यमापन करण्यात आले. नंदुरबारसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात सरकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात या दोन्ही अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी स्थानिक पातळीवर राबवलेले नवोपक्रम आणि प्रशासकीय सक्षमतेमुळे या भागातील सेवा वितरण अधिक परिणामकारक झाले आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नांची दखल आता राज्यस्तरावर घेण्यात आली आहे.
येत्या मंगळवारी, २१ एप्रिल रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्याचे दिग्गज प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडेल.
"या यशामुळे जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला नवे बळ मिळाले आहे. हा सन्मान केवळ आमचा नसून रात्रंदिवस काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याचा आहे. या गौरवातून भविष्यात अधिक जनहितकारी काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळेल."
— जिल्हा प्रशासन, नंदुरबार
या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्वच स्तरांतून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.