

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : पुष्पक एक्सप्रेस मध्ये आग लागल्याच्या भीतीमुळे पाचोऱ्या तालुक्या जवळील नांद्रा ते परधाडे या दरम्यान दुसऱ्या रेल्वे ट्रॅक वर येणाऱ्या नवी दिल्ली - बंगळूर एक्स्प्रेस खाली येऊन ११ प्रवासी ठार झाल्याची घटना आज (दि. २२) सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली. घटनास्थळी जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, रेल्वे डीआरएम व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावकडून पाचोर्याला पुष्पक एक्सप्रेस सायंकाळी जात होती. यावेळी हॉट एक्सेल झाल्यामुळे आग लागल्याचा भीतीने काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारल्या. त्यावेळेस नवी दिल्ली- बेंगळूर एक्स्प्रेस जळगावकडे येत होती. या गाडीखाली चिरडून प्रवाशी जागीच ठार झाले.
रेल्वे प्रशासनाने मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून जखमी व इतर प्रवाशांसाठी नजीकच्या स्थानकांवर तात्पुरती निवासी व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी पाणी व जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदार पाचोरा यांना दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व जिल्हाधिकारी कार्यालय कंट्रोल रूम म्हणून जाहीर केले आहे. रेल्वे खाली येऊन ठार झालेल्या प्रवाशांची ओळख परेडसाठी फॉरेन्सिक टीम पाठवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आठ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
रेल्वेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी कटर व इतर साहित्य घेऊन दाखल झाले आहे. ५ किरकोळ जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक किरण पाटील यांनी दिली आहे.
पाचोरा तालुक्यातील परधाडे या घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन दाखल झाले आहेत. त्यांनी घटनेची पूर्ण माहिती घेऊन जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत.