

जळगाव : खान्देशातील पारंपरिक आणि भावनिक अधिष्ठान असलेल्या कानबाई उत्सवाची सोमवारी (दि.4) मोठ्या उत्साहात सांगता झाली. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या सुरावटीवर नृत्य करत आणि फुगडी खेळत महिलांनी कानबाईचे विसर्जन केले. जिल्ह्यात तापी नदी, मिरवण तलाव आणि इतर तलावांमध्ये विसर्जन पार पडले.
नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईची स्थापना केली जाते आणि त्यानंतर सोमवारी विसर्जन मिरवणूक काढली जाते. यावर्षीही विविध भागांमध्ये पारंपरिक उत्साह, भक्तीभाव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव साजरा झाला.
विशेषतः जळगाव शहरातील नेहरून तलावावर मोठ्या संख्येने महिला आणि भाविकांनी कानबाईचे विसर्जन केले. मात्र, इतक्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरही नेहरून तलाव परिसरात नगरपालिका किंवा कोणतीही सुरक्षा यंत्रणा तैनात झालेली दिसून आली नाही. त्यामुळे संभाव्य अनुचित घटनांचा धोका निर्माण होऊ शकत होता.
कानबाई उत्सव हा जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. श्रीकृष्णाच्या सख्या मानल्या जाणाऱ्या राधिका (कानबाई) आणि चंद्रावली/रुक्मिणी (रानबाई) यांच्या पूजेसाठी समर्पित असलेला हा उत्सव श्रद्धेने साजरा केला जातो.
कानबाई आणि रानबाई या नवसाला पावणाऱ्या देवता मानल्या जातात. स्त्रिया त्यांच्याशी मैत्रीभावाने संवाद साधतात, त्यांच्याकडे सुख, समृद्धी, संतती आणि संकटनिवारणासाठी प्रार्थना करतात.
उत्सवात अहिराणी गीतांचा गोडवा, फुगडी, नृत्य, भजन-कीर्तन, जागरण, आणि खास रोट (पुरणपोळी) यांचा समावेश असतो. या परंपरा खान्देशी ओळख जपतात.
हजारो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव मौखिक साहित्य आणि लोककथांचा ठेवा जपतो. महिलांचे सक्रीय सहभागातून सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतो.
जळगाव शहरात नेहरून तलावावर विसर्जनासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र यावर्षीही सुरक्षा, स्वच्छता किंवा वाहतूक नियंत्रण यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.