

जळगाव : मार्च महिना संपता संपता जळगाव जिल्ह्याने आपला अस्सल 'हॉट' स्वभाव दाखवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या ७२ तासांत सूर्याने जणू रुद्रावतार धारण केला असून, गुरुवारी (२६ मार्च) तापमानाने ३८.५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. रखरखत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले असून जळगावकरांची अक्षरशः 'लाही-लाही' होत आहे.
जिल्ह्यात उन्हाचा कडाका इतक्या वेगाने वाढला आहे की, अवघ्या तीन दिवसांत तापमानाचा आलेख उंचावला आहे. २४ मार्चला ३७.६ अंशांवर असलेला पारा आज थेट ३८.५ अंशांवर पोहोचला आहे. ही वाढ पाहता, येत्या एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चटका किती भीषण असेल, याची धास्ती आतापासूनच नागरिकांना लागली आहे.
केवळ दिवसाच नाही, तर रात्रीही जळगावकर उकाड्याने त्रस्त आहेत. २४ मार्चला १८.६ अंश असलेले किमान तापमान आता २२ अंशांच्या पुढे सरकले आहे. हवेतील आर्द्रता (Humidity) ५८ ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याने घामाच्या धारा थांबण्याचे नाव घेत नाहीत. कोरड्या उष्णतेसोबतच दमट वातावरणामुळे अंगाची आग होत आहे.
पाऊस 'झिरो', ऊन 'हिरो'
हवामान विभागाने पावसाची नोंद 'शून्य' केली आहे. ढगाळ वातावरण नसल्याने सूर्याची किरणे थेट अंगावर येत आहेत. परिणामी, दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे जिकिरीचे बनले असून नागरिक टोपी, रुमाल आणि थंड पेयांचा आधार घेत आहेत.