

जळगाव : शहरातील वाहतुकीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या वाघूर नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथील एक्सपान्शन जॉईंटने केव्हाच काढता पाय घेतला आहे. पुलाच्या सांध्यांमधील रबर पूर्णपणे तुटल्याने सिमेंटच्या स्लॅबचे तुकडे पडू लागले आहेत. दिवसा-रात्र अवजड वाहनांची आणि रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांची वर्दळ असतानाही, 'न्हाई' (NHAI) प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा संतापजनक सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
जीवघेणा प्रवास आणि प्रशासकीय अनास्था
वाघूर नदीवरील या पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी आणि जड वाहने ये-जा करतात. पुलाच्या काही अंतरावरच मोठे रुग्णालय असून, त्यापुढे टोलनाका आहे. त्यामुळे या रस्त्यावर चोवीस तास वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. मात्र, पुलावरील दोन जॉईंट्समधील अंतर वाढले असून, त्याच्या आजूबाजूला रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. जॉईंटमधील रबर तुटल्यामुळे वाहने आदळत असून, यामुळे पुलाच्या संरचनेला (Structure) धोका निर्माण झाला आहे.
साहेबांची भेट मिळेना, अन् उत्तरात फक्त 'आश्वासन'
या गंभीर विषयावर न्हाई (NHAI) च्या कार्यकारी संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोन दिवसांपासून त्यांचा मोबाईल लागत नव्हता. १७ तारखेला प्रत्यक्ष कार्यालयात भेटण्यासाठी गेल्यावर 'साहेब जेवायला गेले आहेत' असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. अखेर आज संपर्क झाला असता, उपकार्यकारी संचालक श्री. साळुंखे यांनी "एक्सपान्शन जॉईंटची ऑर्डर द्यावी लागते, ती आल्यावर दुरुस्ती करू," असे तांत्रिक उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. "अभियंत्यांना सूचना देतो," असे ठराविक आश्वासन त्यांनी दिले असले तरी, प्रत्यक्ष कामाला मुहूर्त कधी लागणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
साहेबांची भेट मिळेना, अन् उत्तरात फक्त 'आश्वासन' या गंभीर विषयावर न्हाई (NHAI) च्या कार्यकारी संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोन दिवसांपासून त्यांचा मोबाईल लागत नव्हता. १७ तारखेला प्रत्यक्ष कार्यालयात भेटण्यासाठी गेल्यावर 'साहेब जेवायला गेले आहेत' असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. अखेर आज संपर्क झाला असता, उपकार्यकारी संचालक श्री. साळुंखे यांनी "एक्सपान्शन जॉईंटची ऑर्डर द्यावी लागते, ती आल्यावर दुरुस्ती करू," असे तांत्रिक उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. "अभियंत्यांना सूचना देतो," असे ठराविक आश्वासन त्यांनी दिले असले तरी, प्रत्यक्ष कामाला मुहूर्त कधी लागणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
न्हाई उपकार्यकारी संचालक श्री. साळुंखे
जबाबदार कोण?
रात्रीच्या वेळी भरधाव वेगात असलेल्या वाहनांना या तुटलेल्या जॉईंटचा अंदाज येत नाही. जर या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाला किंवा रुग्णवाहिकेचा टायर अडकून रुग्ण दगावला, तर याला जबाबदार कोण? 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांनी एसी केबिनमधून बाहेर पडून या मृत्यूच्या सापळ्याची पाहणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.