

जळगाव: मार्च महिना सुरू होताच जळगाव जिल्ह्याने आपले तापमानाचे 'रेकॉर्ड' मोडायला सुरुवात केली आहे. अवघ्या २४ तासांत जिल्ह्याचा पारा तब्बल एका अंशाने वधारला असून तो आता ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सोमवारी ३८.६ अंश असलेला पारा मंगळवारी ३९.६ अंशांवर गेल्याने जळगावकरांना अक्षरशः आगीच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
तापमानाचा असा आहे 'चढता' आलेख
हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, काल (९ मार्च) जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. मात्र, आज १० मार्च रोजी यात वाढ होऊन ते ३९.६ अंशांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे किमान तापमान १५.३ अंशांवर स्थिरावलेले असले तरी, दुपारच्या वेळी पडणारे कडक ऊन जनजीवन विस्कळीत करत आहे. हवेतील आर्द्रता (RH) ७२ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर आल्याने आता उकाडा अधिक 'कोरडा' आणि त्रासदायक झाला आहे.
दुपारी रस्ते ओस, सायंकाळी उकाडा कायम
तापमानात झालेल्या या अचानक वाढीमुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नागरिक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत असून शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढली आहे. रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.