

जळगाव : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. अवघ्या २४ तासांत जळगावच्या कमाल तापमानाने ३७ अंशांचा टप्पा ओलांडला असून, दिवसा उन्हाचा कडाका जाणवत असतानाच रात्री मात्र तापमानात मोठी घट झाल्याने जळगावकरांना 'कधी गरम, तर कधी नरम' अशा विचित्र हवामानाचा सामना करावा लागत आहे.
उन्हाचा पारा चढला, रात्रीचा उतरला
गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी पाहता, ३ मार्च रोजी कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअस होते, त्यात ४ मार्च रोजी ०.७ अंशांची वाढ होऊन पारा ३७.२ अंशांवर पोहोचला आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे किमान तापमानात २.६ अंशांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे. ३ मार्च रोजी १७.० अंश असलेले किमान तापमान ४ मार्चला थेट १५.६ अंशांपर्यंत खाली आले आहे. यामुळे जळगावकरांना दिवसा घाम फोडणारे ऊन आणि रात्री काहीसा गारवा, अशा दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे.
आर्द्रतेत मोठी घसरण, कोरडेपणा वाढला
हवामानातील कोरडेपणा देखील झपाट्याने वाढला आहे. ३ मार्च रोजी हवेतील आर्द्रता (RH) ७५ टक्के इतकी होती, ती ४ मार्चला थेट ५४ टक्क्यांवर आली आहे. एकाच दिवसात आर्द्रतेत २१ टक्क्यांची मोठी घसरण झाल्याने हवेतील ओलावा गायब झाला असून त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांचे तापमान दृष्टीक्षेपात
कमाल तापमान
३६.५°C. ०३ मार्च
३७.२°C. ०४ मार्च
+०.७ (वाढ)
किमान तापमान
१७.०°C. ०३ मार्च
१५.६°C. ०४ मार्च
-२.६ (घट)
आर्द्रता
७५%. ०३ मार्च
५४%. ०४ मार्च
-२१% (घट)
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
तापमानातील या लहरी बदलामुळे (कमाल आणि किमान तापमानातील तफावत) सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तवली आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.