

जळगाव : जळगाव जिल्ह्यावर सध्या सुर्यदेवाचा प्रचंड प्रकोप पाहायला मिळत असून, तापमानाने थेट ४३.३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेसोबतच हवेतील आर्द्रता (ह्युमिडिटी) ६२ टक्क्यांवर पोहोचल्याने जळगावकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.
वाढत्या उष्म्याचा असा आहे 'रुद्रावतार': गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून आज जळगावचे कमाल तापमान ४३.३°C तर किमान तापमान २६.५°C इतके नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे, उन्हाच्या झळांसोबतच आर्द्रतेचे प्रमाण ६२% असल्याने 'उकाडा' प्रचंड वाढला आहे. यामुळे दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तापमानाचा पारा वाढल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.