नाशिक : भुसावळ तालुक्यातून नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची लक्झरी बस नेपाळमधील मारश्यागंडी नदीत कोसळून ४३ पैकी २७ भाविकांचा मृत्यू झाला. यातील २५ जणांचे मृतदेह शनिवारी (दि. २४) सायंकाळी ७.२० वाजता भारतीय वायूसेनेच्या सी- १३० हरक्युलेस या कार्गो विमानाने जळगाव विमानतळावर पोहोचले. जळगाव विमानतळावर सर्व मृतदेहांचा पुन्हा पंचनामा करण्यात आला. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री ९.०५ वाजता शववाहिनींद्वारे मृतदेह रवाना करण्यात आले आणि रात्री ११.१५ ते १२ दरम्यान मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थांबून होते. तसेच मृतांचे प्रत्येकी पाच नातेवाइक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी विमानतळावर हजर होते. नेपाळच्या पोखराजवळील भरतपूर येथून दुपारी ४.३० वाजता विमान रवाना झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून गृहविभागाने विशेष विमानाची व्यवस्था केली. यंत्रणेने युद्धपातळीवर मदत केल्याने अपघातानंतर ३० ते ३२ तासांच्या आत सर्व २५ मृतदेह तब्बल १७०० किमी अंतरावरून कमी वेळेत पोहोचले.
शवपेटीवरील मृताचे नाव चुकल्याने भुसावळ व वरणगाव येथे काहीसा गोंधळ झाला. भुसावळ येथे जे पाच मृतदेह आले, त्यापैकी एका शवपेटीवर सुलभा भारंबे यांचे नाव लिहिले होते. प्रत्यक्ष त्यात वरणगाव येथील सागर जावळे यांचा मृतदेह होता. तर वरणगाव येथे सागर जावळे असे नाव लिहिलेल्या शवपेटीत सुलभा भारंबे यांचा मृतदेह होता. त्यामुळे रात्री १०.२० वाजता सागर जावळे यांचा मृतदेह वरणगाव, तर वरणगाव येथून सरला भारंबेंचा मृतदेह भुसावळला पाठवला गेला. या सर्व प्रकाराने गोंधळ झाला व अंत्यसंस्कार करण्यात उशीर झाला.
नेपाळ अपघातातील मृतांमध्ये सर्वाधिक संख्या १० वरणगावातील भाविकांची आहे. त्यापाठोपाठ तळवेल ५, जळगाव ३, भुसावळात ५, दर्यापूर १, सुकळी (ता. मुक्ताईनगर) १ यांचा समावेश आहे. शनिवारी रात्री अत्यंत शोकाकूल वातावरणात सर्व २५ मृतदेह त्यांच्या गावाकडे पाठवण्यात आले.