![Symbol of victory in India-Pakistan war](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fc3a67d6f-ae5e-44fe-a165-3217a8a99f4b%2FWhatsApp_Image_2024_06_28_at_7_31_27_PM.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
जळगांव : मध्य रेल्वे विभागातील भुसावळ स्टेशन हे जंक्शन स्टेशन असून या ठिकाणी हजारो प्रवासी दररोज ये -जा करीत असतात. स्टेशनच्या प्रवेश द्वाराजवळ सुंदर असे गार्डन बनवण्यात आले होते. या गार्डनमध्ये भारत -पाकिस्तानच्या युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून रणगाडा ठेवण्यात आलेला आहे. याच ठिकाणी शंभर फुटावर तिरंगी ध्वज फडकत आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी काही अधिकार्यांनी कोच रेल कॅन्टींग सुरू करण्याची परवानगी देऊन संपूर्ण गार्डन व प्रवेशद्वार बेरंग केले होते. त्याचा परिणाम असा झाला की आज हे सैनिकांच्या बलिदानाने मिळालेले विजयाचे प्रतिक बेवारस पडलेले आहे. त्या ठिकाणी मातीचे ढिगारे आजूबाजूला पडलेले आहेत. मात्र रेल्वे प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे अमृत भारत या योजनाचे काम पूर्ण डिव्हिजन मध्ये करून घेत आहे.
भुसावळ रेल्वे स्थानक हे जंक्शन स्टेशन असून प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन आहे. या दृष्टिकोनातून भुसावळ रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार पश्चिमेकडील सुंदर बनविण्यात आले होते. या ठिकाणी भारत -पाक विजयाचे स्मारक रणगाडे, शंभर फुट भारतीय ध्वज फडकत आहे. आजही या ठिकाणी या वस्तू आहे. मात्र या ठिकाणी बनवलेले गार्डन अस्तित्वात नाही.
काही महिन्यापूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्टसाठी म्हणजे रेल कॅन्टीन (डब्याचे रेस्टॉरंट) उघडण्यासाठी या प्रवेशद्वारावर परवानगी दिली होती. त्यामुळे रेस्टॉरंट सुरू करणाऱ्या व्यक्तीने या ठिकाणी गार्डन मधली झाडे गालीच्या काढून फेकून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट चे काम केलेले होते. मात्र काही दिवसांनी त्या ठिकाणाहून रेल्वेचा डब्बा जो रेस्टॉरंट साठी वापरण्यासाठी देण्यात आलेला होता तोही उचलण्यात आला. मात्र आज हे विजयाचे प्रतिक बेरंग व बेवारस पडलेले आहे. याच्या बाजूला गाय- बकऱ्या फिरताना दिसतात.
ज्या विजयासाठी आपल्या भारतीय सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन आपल्या रक्ताने विजयाचा तिलक केलेला होता. ते विजयाचे स्मारक असलेले रणगाडे आज बेवारस अवस्थेत पडलेले आहेत.
ज्या अधिकाऱ्यांमुळे गार्डनचे नुकसान झाले त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आज रेल्वेच्या माध्यमातून काही रेल्वे स्थानकांचा अमृत भारत या योजनेच्या माध्यमातून विकास करण्यात येत आहे. असे असताना मात्र भुसावळ स्थानकातील हे विजयाचे प्रतीक आज बेवारस स्थितीत पडलेले आहे. याकडे कोणी लक्ष देईल का?