

जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सुरू असलेली सर्वेक्षण प्रक्रिया ही पूर्वी १५ मेपर्यंत मर्यादित होती. मात्र, शासनाने या सर्व्हेसाठीची मुदत वाढवून आता ३१ मे २०२५ पर्यंत वाढ दिली आहे.
लाभार्थ्यांनी हा सर्व्हे स्वतः ऑनलाईन पद्धतीने किंवा ग्रामसेवकांच्या माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी गावपातळीवर सरपंचांनी पुढाकार घ्यावा आणि अधिकाधिक ग्रामस्थांना या सर्व्हेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
या सर्व्हेमुळे पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध होईल आणि गरजू नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देता येईल. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा व मुदतीच्या आत सर्व्हे प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.