

जळगाव : नागपूर येथे सुरू असलेल्या महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल 250 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आ. मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे. येत्या दोन वर्षात वरखेडे धरण क्षेत्रातील चाळीसगाव तालुक्यातील 20 गावांना बंदिस्त पाटचारीद्वारे शेतीला पाणी मिळणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पहिल्या टर्ममध्ये विविध विकास कामांच्या पुर्ततेसह विशेषतः सिंचन विषयक कामांची पायाभरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. पुढील पाच वर्षात तालुक्यातील सिंचन, रोजगार व पायाभूत सुविधा यावर लक्ष देऊन तालुका सुजलाम सुफलाम व उद्योगसंपन्न करायचा आहे. चाळीसगाव मतदारसंघात चव्हाण यांच्या दुसऱ्या टर्मची आमदारकीची शपथ घेऊन पंधरवड्यात तालुक्यातील बहुप्रतिक्षित अशा वरखेडे धरणाला 250 कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात त्यांना यश मिळाले आहे.
सद्यस्थितीत वरखडे धरणाच्या बंदिस्त पाटचारीचे काम सुरू असून जवळपास 15 टक्क्याहुन जास्त काम प्रगतीपथावर आहे. मंजूर झालेल्या निधीमुळे या कामाला चालना मिळणार असून या सोबतच प्रलंबित असलेल्या तामसवाडी गावाचे पुनर्वसन व उपखेड / सेवानगर येथील भूसंपादन यासाठी देखील हा निधी वापरता येणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात वरखेडे धरण क्षेत्रातील चाळीसगाव तालुक्यातील 20 गावांना बंदिस्त पाटचारीद्वारे शेतीला पाणी मिळणार आहे. धरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे सन 2024-25 या एकाच आर्थिक वर्षात एकूण तब्बल 389 कोटी रुपये निधी वरखेडे धरणाला मिळवून देण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे.
नियमित आर्थिक तरतूद - 39 कोटी
पावसाळी अधिवेशनात मिळालेली पुरवणी मागणी - 100 कोटी
हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी - 250 कोटी
सन 2024-25 आर्थिक वर्ष एकूण - 389 कोटी निधी मंजूर