जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण विभागावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातून होत असते. मात्र सध्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार झाले असून ऐन पावसाळ्यात काही भागात रस्त्याचे काम अद्यापही सुरू आहे. येथील रस्त्यावरील पावसाचे पाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निचरा काढण्यात आलेला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी प्रवेश द्वाराजवळ साचत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
आकाशवाणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याचे काम सुरू आहे. यामधील एका भागाच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झालेले आहे दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम अद्यापही सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ रस्त्याचे काम सुरू आहे. तर बाहेर पडण्याच्या मार्गा समोरील रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. ठेकेदाराने हा रस्ता बनवितांना संपूर्ण पाण्याचा निचरा हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळच पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत अधिकाऱ्यांसह नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
या रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू आहे. ज्या जिल्ह्याचे महत्त्वाचे कार्यालय असे जिल्हाधिकारी कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या प्रमाणात ये जा करीत आहेत. साचलेल्या पाण्याजवळच बाजूला कॅन्टीन आहे. नागरिक या ठिकाणी चहा नाश्ता करण्यासाठी येत असतात. साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागण्याची शक्यता आहे. तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.