

जळगाव: जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिली असतानाही बळीराजाने धिटाई दाखवत तब्बल ९१ टक्के खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांना ठिबक सिंचनाने दिलासा दिला असला, तरी कोरडवाहू शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी माना टाकू लागली असून ती पिवळी पडू लागली आहेत. वरुणराजाची अशीच अवकृपा राहिल्यास बळीराजावर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाची अपेक्षित हजेरी नसतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पेरण्या पूर्ण केल्या.
मका- १७३%
तूर- २३२%
मूग व उडीद- ८०% पेक्षा जास्त
बाजरी- ४२%
ज्वारी- ३०%
ज्या विहिरी आणि कूपनलिका धारकांकडे पाण्याची सोय आहे, त्यांनी ठिबकच्या जोरावर कापूस आणि इतर पिके जगवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अशा बागायती भागात पिकांची कोळपणी व निंदणीची कामे वेगाने सुरू असून, महिला मजूर हातात विळ्या घेऊन गवत काढताना दिसत आहेत.
काल सायंकाळी जळगाव शहरात तर दुपारी जळगाव ते पाचोरा दरम्यान केवळ पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढग जमा होत असले तरी दमदार पाऊस मात्र गायब आहे.