

जळगाव : “ज्या वसतिगृहात आपण शिक्षण घेत आहात, त्या वसतिगृहाची ओळख ही सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण व्हायला हवी. केवळ न्यायहक्कासाठी संघर्ष करण्यापुरते मर्यादित न राहता उपलब्ध साधनांद्वारे सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगती साधावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात ‘जिल्हाधिकारी आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने झाला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित व प्रा. संदीप केदार यांनी अनुवादित केलेल्या ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या पुस्तकाच्या 500 प्रतींचे वाटप जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक इंदाई प्रकाशनने प्रकाशित केले असून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सौजन्याने वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात मंचावर प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, प्रा. संदीप केदार, द इंडियन एक्सप्रेसचे अनिल सोनवणे, बांभोरी गावाचे सरपंच बिर्हाडे, गृहप्रमुख संतोष बच्चे, विजय गाडे, वासुदेव बच्चे, अलका दाभाडे, मीनाकुमारी चौधरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पारंपरिक आदिवासी पेहरावात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संदीप केदार व अनिल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खेळ, अभ्यास, नृत्य, व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्वकला यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.