जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीच्या कामांना सुरुवात केली. मुक्ताईनगर तालुक्यात आपल्या शेतात खुरपणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर वीज पडून तो जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी दोन किलोमीटरचे अंतर कापून रुग्णालयात आणले पण व्यर्थ काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. मुलाला वाचविण्यात यश आले नाही.
रविवार (दि.18) रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथे शेतीचे कामासाठी शेतात गेलेल्या आई-वडील मोठा भाऊ व मयत ईश्वर शांताराम सुशीर (वय-२२, रा. पिंप्राळा ता.मुक्ताईनगर) हे पिंप्राळा शिवारात असलेल्या शेतात खुरपणीसाठी गेले होते. रविवारी दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सोबत विजांचा कडकडाट होऊन पावसास सुरुवात झाली. त्यामुळे सगळ्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर ईश्वर हा पुढे जात असताना त्याच्यावर वीज कोसळली व त्याचे पाय भाजले गेले आणि तो जमिनीवर कोसळला. यावेळी शेतात असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोठ्या भावाला आवाज दिला तो ईश्वर जवळ पोहचताच त्याने लहान भावाकडे बघून हंबरडा फोडला. तर वडीलांनी तत्काळ मुलाला वाचवण्यासाठी त्याला खांद्यावर घेत गावातील आरोग्य केंद्रात दोन किलोमीटर धावले. खांद्यावर घेऊन जातांना रस्ता नसतानाही त्यांनी अडचणींवर मात करत मुलाला खांद्यावर उचलून दोन किलोमीटरचे अंतर कापले. मात्र रुग्णालयापर्यंत पोहचताच ईश्वरने अखेरचा श्वास घेतला होता.
मुक्ताईनगर, प्रिंपाळा भागातील शेतात जाण्यासाठी अजूनही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अतिदक्षतेच्या संभाव्य घटना घडल्यानंता कोणत्याही वाहनाची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे वडिलांनी मुलावर ओढवलेल्या संकटाला पाठीवर घेत दोन किलोमीटरच्या अंतरावर कापत कुऱ्हा येथील आरोग्य केंद्रात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर शेतकरी आई वडीलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.