

जळगाव: जिल्ह्याला 'महाराष्ट्राचे राजस्थान' का म्हणतात, याची प्रचिती मार्चच्या पहिल्याच आठवड्यात येऊ लागली आहे. ममुराबाद वेधशाळेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन दिवसांत तापमानाचा पारा सातत्याने चढत असून, शुक्रवारी (६ मार्च) तो थेट ३८.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, तापमानासोबतच हवेतील आर्द्रतेचे (RH) प्रमाणही ७८ टक्क्यांपर्यंत वाढल्याने जळगावकरांना कोरड्या उन्हाऐवजी चिकचिकीत उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
तीन दिवसांचा चढता आलेख (ममुराबाद वेधशाळा)
दिनांक : ४ मार्च
३७.२ कमाल तापमान (°C)
१५.६ किमान तापमान (°C)
५४%. आर्द्रता (RH %)
दिनांक : ५ मार्च
३८.०कमाल तापमान (°C)
१६.०किमान तापमान (°C)
७२%आर्द्रता (RH %)
दिनांक : ६ मार्च
३८.५कमाल तापमान (°C)
१८.२किमान तापमान (°C)
७८%आर्द्रता (RH %)
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 'हॉट' मार्च
गेल्या वर्षीचा (मार्च २०२५) विचार केला असता, मार्चच्या पहिल्या आठवड्यात जळगावचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिर होते. मात्र, यंदा ६ मार्चलाच पारा ३८.५ अंशांवर पोहोचल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरीस तापमानाने चाळीशी ओलांडली होती, मात्र यंदाचा वेग पाहता होळीपूर्वीच जळगावकर चाळीशीचा चटका सोसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आर्द्रतेने वाढवली अस्वस्थता
सामान्यतः जळगावचे ऊन 'कोरडे' असते, पण ममुराबाद वेधशाळेने नोंदवलेली ७८ टक्के आर्द्रता ही चिंतेची बाब ठरत आहे. ४ मार्चला ५४ टक्के असलेली आर्द्रता ६ मार्चला ७८ टक्क्यांवर गेल्याने घामाचे प्रमाण वाढले असून अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानातील वाढ आणि किमान तापमानाचाही पारा (१८.२ अंश) चढल्याने रात्रीचा गारवाही आता गायब झाला आहे.
पुढारी इशारा: सावध राहा
दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसल्यास बाहेर पडणे टाळा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, ताक आणि पाण्याचे सेवन वाढवा.
डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करा.
दुपारी १२ ते ४ या वेळेत काम नसल्यास बाहेर पडणे टाळा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, ताक आणि पाण्याचे सेवन वाढवा.
डोळ्यांच्या संरक्षणासाठी गॉगल आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करा.