

जळगाव : जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी १० वाजेच्या अहवालानुसार, हतनूर धरणाचे तब्बल २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून, यामधून ४९ हजार ५८२ क्युसेक (१४०४ क्युमेक्स) वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने तापी नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाने तात्काळ सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पाणलोट क्षेत्रात मुसळधार; धरणात जलसाठा वाढला
गेल्या काही तासांत धरण क्षेत्रात २८ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पाऊस ७६ मिमीवर पोहोचला आहे. यामुळे धरणाची सद्यस्थिती खालीलप्रमाणे चिंताजनक आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग वाढवणारी ठरली आहे:
सध्याची पाणीपातळी: २१२.१८० मीटर (एकूण क्षमता: २१४.००० मीटर)
एकूण पाणीसाठा २८९.०० दलघमी (७४.४८%)
जिवंत पाणीसाठा १५६.०० दलघमी (६१.१८%)
नदीपात्रात पाण्याचा प्रचंड लोंढा; कालव्यातूनही विसर्ग सुरू
धरणात येणारी पाण्याची आवक पाहता पूर नियंत्रण विभागाकडून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. २२ वक्राकार दरवाजे १ मीटरने वर उचलून तापी नदीत पाणी सोडले जात आहे. याशिवाय मुख्य कालव्यातून देखील ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) वेगाने विसर्ग सुरू आहे. सध्या उजव्या कालव्याचे दरवाजे मात्र बंद आहेत.
हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्हानपुर 52, देड तलाई 58.2, लखपुरी 9.4, अकोला 6.4, टेक्सा 27.2, एरंडी 32, गोपालखेडा 3, चिखलदरा 82.2, लोहारा 21 अशा पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद झाली असून एकूण 388.4 मिलिमीटर पाऊस झालेला आहे. हातनुर परिसरात 88 मिलिमीटर पाऊस झालेला आहे.