

जळगाव : राष्ट्रीय एकता दिवस आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात “Sardar@150 Unity March” या उपक्रमांतर्गत पदयात्रा उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, आपण आज जो अखंड आणि एकसंघ भारत अनुभवत आहोत, त्या निर्मितीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी संस्थानांचे विलिनीकरण करून अखंड भारताची पायाभरणी केली. संविधान समितीचे ते सदस्य होते आणि देशाला घडवण्यात तसेच एकसंघ करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
ही पदयात्रा युवक कार्य आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत या उपक्रमाद्वारे आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार (दि.31) रोजी सकाळी ९ वाजता महानगरपालिका टॉवर चौकातील सरदार पटेल पुतळ्यापासून पदयात्रेची सुरुवात झाली. पुढे ही पदयात्रा चित्रा चौक, बेंडाळे चौक, न्यू बी.जे. मार्केट, पांडे चौक, बीएसएनएल कार्यालय मार्गे सरदार वल्लभभाई हॉल येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित अधिकारी, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांनी येथे राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली आणि “आत्मनिर्भर भारत” निर्मितीचा संकल्प केला.
25 नोव्हेंबरपर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन
जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबरदरम्यान राज्यभर वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्ती आणि एकतेचा संदेश दिला जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय रॅलीत सहभागी होण्याची संधी मिळेल.
खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, भारत हा एक संघ आहे आणि त्याची एकता हेच आपले खरे सामर्थ्य आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील संस्थानांना एकत्र करून भारताला अखंड स्वरूप दिले, म्हणूनच त्यांना ‘लोहपुरुष’ म्हटले जाते. प्रत्येकाने ‘मी भारताचा नागरिक आहे’ या भावनेने काम केले पाहिजे.
आमदार सुरेश भोळे (मामा) यांनी सरदार पटेल यांच्या विचारांनुसार चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी, अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागामुळे ही पदयात्रा यशस्वी झाली. उपस्थित सर्वांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.