

जळगाव : सततच्या मस्करी आणि छेडछाडीच्या वादातून निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे घडली. या हल्ल्यात अबुजर रफीक शेख (वय १९) हा तरुण गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे. ही घटना शुक्रवारी १४ रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर मुक्ताईनगर पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, बेलसवाडी येथील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर शुक्रवारी रात्री ८:४५ वाजता मयत अबुजर शेख आणि संशयित अल्पवयीन मुलगा आमनेसामने आले. मयत अबुजर हा संशयित अल्पवयीन मुलाला सतत त्रास देऊन त्याची छेड काढत होता, यावरून दोघांमध्ये आधीपासूनच तीव्र वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री याच कारणावरून पुन्हा खटका उडाला. वादाचे रूपांतर पाहाता पाहाता हिंसक संघर्षात झाले. रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने जवळ असलेला धारदार चाकू काढून अबुजरच्या छातीत सपासप वार केले. छातीत खोलवर वार झाल्याने तीव्र रक्तस्राव होऊन अबुजर जागीच कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात
या प्रकरणी मयताचे वडील रफीक शेख नुरा (वय ४०, रा. बेलसवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित अल्पवयीन मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३ (१) (हत्या) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (CCTNS क्र. ३१९/२०२६). घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि अवघ्या काही तासांतच संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करत आहेत.