जळगाव : भुसावळ येथे चार वर्षांपूर्वी रिपाईचे जिल्हाध्यक्ष व भाजपाचे नगरसेवक रवींद्र बाबुराव खरात यांच्यासह पाच जणांची हत्या झाली होती. या हत्याकांडातील जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या संशयित आरोपींमध्ये अंतर्गत वाद होऊन एकाची हत्या झाली आहे. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून भुसावळचे गॅंगवार हे आता मध्यवर्ती कारागृहापर्यंत पोहोचले आहे.
भुसावळचे भाजपाचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळातील आरपीडी रस्त्यावर व रेल्वे दवाखान्या शेजारी अतिशय क्रूर हत्या झाली. खरात यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचा गोळीबारात मृत्यू झाला होता.
पुर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान (वय ३४) याचे दुसरा संशयित आरोपी याच्याशी दि. 9 रोजी दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या संशयित आरोपीने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. पोलिसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.