

जळगाव : जळगाव जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच तापमानाचा उच्चांक नोंदवला जात असून, त्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गडद झाली आहे. एप्रिलमध्येच तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले आहे, त्यामुळे 'मे हिट'चा अनुभव एप्रिलमध्येच येऊ लागला आहे.
जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. या चार तालुक्यांतील सात गावांमध्ये सुमारे आठ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे विहिरींच्या अधिग्रहणालाही गती देण्यात आली असून, एरंडोल तालुक्यात 1, मुक्ताईनगरमध्ये 4, पाचोरामध्ये 4, चाळीसगावमध्ये 4 आणि अंमळनेर तालुक्यात 8 अशा एकूण 31 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोतांमध्ये हतनूर, गिरणा आणि वार प्रकल्पांचा समावेश होतो. यावर्षी हातनूर धरणात फक्त 44.78 टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर गतवर्षी याच कालावधीत तो 47.6 टक्के होता. म्हणजेच हतनूरमध्ये यंदा सुमारे तीन टक्के जलसाठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे.