

जळगाव : उच्च माध्यमिक परीक्षेच्या काळामध्ये कोणीही कॉपी करू नये, यासाठी प्रशासन, पोलिस व शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली होती. असे असतानाही धरणगाव केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून यामुळे पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला गालबोट लागले आहे.
जिल्ह्यात ११ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. ८१ केंद्रातून ४७६६७ विद्यार्थी परीक्षा देत असून आज बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. शाळेत प्रवेश करतानाच विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेगवेगळ्या गेटने प्रवेश देत त्यांची तपासणी करण्यात येत होती. योग्य ती खबरदारी घेऊनही धरणगाव येथे दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने धरणगाव येथील केंद्र क्रमांक ७९५ वर दोन विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडल्याने कॉपीमुक्त अभियानाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याला गालबोट लागल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.