जळगांव : अधिवेशनाच्या चहापाण्याच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा चालू असताना अजित पवार यांचा चेहरा पडलेला दिसला. लोकसभेच्या निवडणूकीत अजित पवारांना सोबत घेतल्याने जो फटका बसला तो पुन्हा बसू नये म्हणून येत्या विधानसभेत अजित पवारांना सोडून निवडणूक लढावी लागणार अशी चर्चा आता त्यांच्यात सुरू आहे. त्यामुळे आता अजित पवारांना त्यांचे आमदार सोडून जातील. याचा सर्वात पहिला प्रयोग आपल्या जळगावात होईल. अजित पवारांना सोडणारा पहिला आमदार अमळनेरचे अनिल भाईदास पाटील असतील असे वक्तव्य चिंतन बैठकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले. यामुळे राजकारणामध्ये एक नवीन खळबळ उडाली आहे
लोकसभेमध्ये झालेल्या पराभवावर जळगाव येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने चिंतन बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य करून राजकारणात होणाऱ्या बदलाबद्दल संकेत दिले. राजकारणामध्ये सुरू झालेल्या चर्चांमध्ये अजित पवार गटामुळे भाजपा व शिवसेनेला फटका बसला. त्यामुळे येत्या निवडणुकीत अजित पवारांना सोडून निवडणूक लढवावी लागेल असे भाजपचे लोक म्हणत आहेत. भाजपा व सेना याबद्दल काही बोलत जरी नसले तरी काही जण आपली तयारी करीत आहे. मंत्री अनिल पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या घेतलेल्या भेटीचा संदर्भ देत सतीश पाटील यांनी हे वक्तव्य केले. अजित दादा गटाचे मंत्री अनिल पाटील हे सी आर.पाटील यांच्याकडून भाजप मध्ये येण्याची लाईन लावत असल्याचा दावा सतीश पाटील यांनी केला.
त्यानुसार पहिला प्रयोग मंत्री अनिल पाटील करत असून अजित दादांना सोडणारा पहिला कोणी माणूस असेल तर तो अनिल पाटील असेल असा दावा त्यांनी केला. आपले थोडे फार संबंध आहे. त्यानुसार एका मोठ्या नेत्याने अनिल पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती दिली असं डॉ.सतीश पाटील म्हणाले.
जळगाव येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाची मंथन व चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत भाषणात डॉ. सतीश पाटील यांनी हे वक्तव्य केले.
मंत्री अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीत येण्यापूर्वी भाजपाचे नेते होते. त्यांनी जिल्हा परिषद जिंकून भाजपाचे प्रतिनिधित्वही केले. मात्र भाजपा मध्ये झालेल्या घडामोडींमुळे नाराजी असल्याने त्यांनी भाजपला रामराम करून त्या वेळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यावर व विधानसभेची निवडणूक जिंकल्या बरोबर अजित पवारांनी भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असताना अनिल भाईदास पाटील ही अजित पवारांबरोबर गेल्यामुळे ते नामदार झाले.