

सोनगीर : धुळे तालुक्यातील तामसवाडी आणि डोंगरगाव परिसरातील सुमारे १८ ते २० शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील वीजपंप आणि केबलची चोरी झाली असून, लाखो रुपयांच्या वस्तू लंपास करण्यात आल्या. ही घटना रात्री घडली असून, या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंगरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन तामसवाडी शिवारात असून, मंगळवारी रात्री शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य चोरीस गेल्याचे सकाळी लक्षात आले. यात धनराज दगडू पाटील, विजय रामभाऊ पाटील, विठ्ठल भिका पाटील, बन्सी पाटील (मांडळ), हिंमत लक्ष्मण कोळी, भिकन लक्ष्मण कोळी, पंडित महादू पाटील, लोटन पंडित पाटील, शिवपुरी गोसावी, भोलापुरी संतोषपुरी गोसावी यांसह इतर काही शेतकऱ्यांच्या विहिरींवरील पंप आणि महागड्या वायर चोरीस गेल्या.
बुधवारी (दि.३) सकाळी डोंगरगाव, तामसवाडी आणि मांडळ येथील हवालदिल शेतकऱ्यांनी सोनगीर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. शेतकऱ्यांवर वादळ, अवकाळी पाऊस, असे अस्मानी संकट उभे असताना, आधीच कर्जबाजारी बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. ऐन हंगामात सिंचनाची साधने चोरीला गेल्याने शेती करायची कशी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.