

पिंपळनेर,जि.धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे, खुडाणे, डोमकानीसह परिसराला गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसामुळे मेघगर्जनेसह परिसराला चांगलेच झोडपले आहे. रोहिणी नदीस पूर आला असून त्यातच डोमकानीजवळ ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मंगळवार (दि.15) रोजी रात्री दहाच्या सुमारास आमदर काळीभुई हा जुना पाझर तलाव फुटला. परिणामी पुराच्या पाण्या महापुराचे रुद्ररूप घेतले.यामुळे शेतीत खूप पिकांचे नुकसान झाले आहे.
मंगळवार (दि.15) रात्री अकरा वाजेच्या सुमारास निजामपूर, जैताणे गावामध्ये पुराचे पाणी शिरले. जैताणे येथे ग्रामदैवत भवानीदेवी मंदिर परिसरातील नागरवाडीपर्यंत पाणी शिरले. सरपंच प्रतिनिधी गजानन शाह यांनी वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. दुर्घटना होऊ नये यासाठी रोहिणी नदीकिनाऱ्यावर असलेल्या दोन डीपी त्यांनी तत्काळ बंद केल्या. निजामपूरचे सहायक पोलीस नीरीक्षक मयूर भामरे यांनी मंगळवार (दि.15) रात्री तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अचानक आलेल्या वादळी वारे व मुसळधार पावसात मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, कांदे आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतात तलावसदृ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास असमानी संकटाने हिरावून घेतला आहे. वादळी वारे व मुसळधार पावसामुळे मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, कांदे आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी तातडीने याबाबत दखल घेतली आहे. तलाठी जितेंद्र बागुल हे घटनास्थळी हजर होत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी भास्कर पवार, सुरेश सोमनाथ, दिलीप गवळे, गोकुळ शिंदे आणि डोमकानी उपसरपंच ललित पवार हे देखील उपस्थित होते.
नुकतेच आचारसंहितेचा बिगुल वाजल्याने शेतकऱ्यांवर आलेल्या असमानी संकटावरील उपाययोजना, पंचनामा व त्यानंतर प्राप्त निधीसाठी सरकार स्थापन होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.