

पिंपळनेर,जि.धुळे : दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाला महागाईचा तडका बसला आहे. महिनाभरापूर्वी असलेले खाद्यतेलाचे दर चांगलेच भडकले आहेत. महिनाभरापूर्वी 110 प्रतिकिलो दराने विकला जाणारे खाद्यतेल आता 145 रुपयांवर विकले जात आहे.
खाद्यतेलामध्ये आणखी दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. दिवाळी हा उत्साह व आनंदाचा सण मानला जातो. यानिमित्ताने पाहुण्यांची रेलचेल प्रत्येक घरात दिसून येते. या काळात श्रीमंतासोबत सर्वसामान्यांचा उत्साह शिगेला असतो. परंतु,सणासुदीच्या काळातच खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. परिणामी दसरा-दिवाळीच्या काळात सर्वसामान्य गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. यंदा खाद्यतेलासह कडधान्य, डाळींच्या किमती वाढल्या आहेत. महिनाभरापूर्वी असलेल्या डाळींच्या दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
160-180 रूपये प्रतिकिलो मिळणारी तूरडाळ आता 200 ते 220 रूपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य कुटुंबीयांना बसला आहे. सणामुळे गव्हापासून तयार होणारा रवा, मैदा आणि आट्याच्या दरात किलो मागे 5 ते 8 रुपयांची वाढ झाली आहे. आयात मंदावल्याने बाजारभाव वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक वस्तूंचे दर 5 ते 10 रूपयांनी वाढले आहेत. मसूर डाळीचा दर प्रतिकिलो 80 ते 110 रुपये झाला आहे.