पिंपळनेर, जि.धुळे : कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य देखील तेवढेच महत्वाचे आहे, असे प्रतिपादन निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी केले.
जैताणे येथील ग्रामसभेत विविध विकास कामांवरील चर्चाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांनी ग्रामस्थांना वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायदा सुव्यवस्थे विषयी माहिती दिली. गावात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. संशयीत व्यक्ती दिसल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे. परिसरात बोगस खत, बियाण्याचे जाळे पसरले आहे. ती आपण मोडीत काढूच परंतू शेतकरी बांधवांनी देखील बी बियाणे, खतांविषयी माहिती घेवून खात्री करूनच ते खरेदी करावे असे त्यांनी आवाहन केले. गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेसह शारीरीक फिटनेसकडे लक्ष द्यावे. कोणी संकटात असल्यास 112 मदत क्रमांकावर हाक देण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थी व मुलींना कोणीही त्रास देत असेल तर त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा. सर्व ग्रामस्थांनी देखील सक्षम व्हावे असे आवाहन भामरे यांनी केले.
यावेळी सरपंच कविता मुंजगे, उपसरपंच बाजीराव पगारे, ग्राम पंचायत सदस्य राजेश बागूल, पोपट न्याहाळदे, गणेश न्याहाळदे, मनियार सत्तार, समाधान महाले, राकेश शेवाळे, नंदकुमार जाधव, ग्रामसेवक अनिल राठोड, लिपीक यादव भदाणे, डॉ.गावित, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामपालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.