पिंपळनेर, जि.धुळे : तीन दिवसीय वनभाजी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात आयोजित वनभाजी स्पर्धेत साक्री तालुक्यातील शेंदवड येथील रमिला पोपट गावीत या युवतीने जंगलातील आळीब, फांद्या, ओवा, बाफळी, बांबू कोम्ब, कडव्या, हलुंद, केळभाजी आदी खाद्यपदार्थांचा लज्जतदार 155 प्रकारांचा मेनू ठेवला. या स्पर्धेत सर्वाधिक वनभाज्या ठेवल्यामुळे आयोजकांनी रमिला गावित या युवतीचा प्रथम क्रमांक जाहीर करून तिला रोख 11 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले आहे. यावेळी तीन दिवसीय वनभाजी महोत्सवाचाही समारोप झाला आहे.
यावेळी झालेल्या वनभाजी स्पर्धेत प्रथम क्रमांक रमिला गावित, द्वितीय तारा कामडे, तृतीय अनिता पवार तर उत्तेजनार्थ भारती अहिरे व सुनीता पवार यांना रोख बक्षीस देण्यात आले. पर्यटन संचालनालय व जैवविविधता संरक्षण समिती, बारिपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने बारीपाडा येथे तीन दिवसीय वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश अंबादासराव जोशी, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे, मुख्य वन संरक्षक निनु सोमराज, उपवनसंरक्षक नितीन शिंग, उपसंचालक पर्यटन मधुमती सरदेसाई, पुष्पा गावित उपस्थित होते.
ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात वनभाज्यांचे संवर्धन होते, हे कौतुकास्पद आहे. हा उपक्रम प्रत्येक गावात होणे महत्त्वाचे असून, स्पर्धेसाठी शालेय विद्यार्थ्यांना जोडून संपूर्ण महाराष्ट्र वनभाज्यांचे प्रसार होणे गरजेचे असल्याचे आवाहन वनभाजी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले माजी न्यायाधीश अंबादासराव जोशी यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत महिलांनी जंगलातील आळीब, फांद्या, ओवा,बाफळी,बांबू कोम्ब, कडव्या, हलुंद, केळभाजी, कोहळा, आंबाडी, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगलीचूच, मेका, मोका, नागगुल, घोळभाजी, उदळा, पुंजऱ्या, अळीव, ओवा, केनाभाजी, चटक चांदणी, झेला, तुळश्या कंद, चंदळ, शेवरा, राजगिरा, रानतुळस, सोनरु, सोलव्या निंबू, शिरीसफूल, तुराठा, उळशी, उळशीमोहर, वनदोडका, वनस्पतीच्या मुळ्या, पाने फुले, खोड साल, बी आदी विविध वनभाज्या स्पर्धेत ठेवल्या होत्या. स्पर्धेनंतर नागरिकांनी वनभाज्यांचा आस्वादही घेतला. मालती पवार व अभिमन पवार यांनी सुत्रसंचलन केले.