पिंपळनेर (जि.धुळे) : येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी असून यानिमित्ताने पंढरपूर येथे मोठी यात्रा भरत असते. त्यासाठी साक्री तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने जात असतात.
साक्री आगारातून पंढरपूर यात्रेसाठी 25 बस सोडण्यात येणार असून 10 बसेस अहमदनगर विभागास पाठविण्यात येणार आहे. विठुरायाच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी राज्यातून भाविक पंढरपूरच्या यात्रेत सहभागी होतात. या वर्षी पंढरपूरची आषाढी यात्रा 13 तारखेपासून सुरू होत आहे. 17 जुलैला आषाढी एकादशी व 21 जुलैला पौर्णिमा असली, तरी भाविकांची गर्दी पहिल्या दिवसापासून म्हणजे 13 जुलैपासूनच होत असते. विठुरायांच्या चरणी श्रद्धा ठेवून अनेक भाविक पायी प्रवास करीत दिंड्या काढून पंढरपूरकडे रवाना होतात. या पायी दिंडीच्या निमित्ताने यात्रेत लहान मुलांसह अबालवृद्ध भाविकांचा मोठा सहभाग असतो. मुखी विठुमाउली नाव घेत टाळमृदुंगाच्या गजरात हे वारकरी पंढरपूर गाठून आपल्या विठुमाउलीच्या चरणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेत असतात.
राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट देण्यात आली आहे, तसेच 75 वर्षांपुढे ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच ज्या गावात 44 प्रवासी उपलब्ध होतील अशा गावांना साक्री आगाराकडून बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांनी सुखकर सुरक्षित प्रवासासाठी बसच्या सुविधेचा लाभ घ्यावा.-सुनील महाले,आगार व्यवस्थापक साक्री.