

धुळे : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) आजपासुन सुरू झाल्या आहेत. परिक्षेच्या पहिल्या दिवशीच्या पेपरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील 47 केंद्रांवरील 1 हजार 22 वर्गांचे ऑनलाईन लिंकद्वारे सनियंत्रण केल्याने शासनाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाली. या संकल्पनेचे केंद्रचालक, पालक, विद्यार्थ्यांनी स्वागत केल्याची माहिती शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये पार पडण्याचे निर्देश दिले आहे. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनीही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यंदाची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर कॉपी सारखे गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश देखील दिले आहेत. तसेच परीक्षा कॉपीस करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा सुचना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या भगवान बिरसा मुंडा सभागृहात जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची (वॉररूम) स्थापना करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी फागणे येथील केंद्रावर ड्रोनद्वारे पाहणी केली. भेटीत नरवाडे यांनी भयमुक्त, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षेा घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्यात. तसेच आज इंग्रजीच्या पेपरला साधारणत: दोन ऑनलाईन लिंकद्वारे एकूण 47 केंद्रांवरील 1 हजार 22 वर्गांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. याच पद्धतीने बारावी व दहावीच्या सर्व पेपरचे ऑनालईन लिंकद्वारे सनियंत्रण करण्यात येणार आहे. याकरीता 47 केंद्रसंचालक, 47 रनर्स व 8 परिरक्षक यांना स्वतंत्र ऑनलाईन लिंक देऊन वॉर रूम मधून नियंत्रण करण्यात येणार आहे.