

धुळे : बीड जिल्ह्यातील तरूण शेतकर्याने आपल्या मागण्यांसाठी थेट विधानभवनाच्या आवारात एका उंच झाडावर चढून बुधवारी (दि.२६) उग्र आंदोलन केले. या तरूणाला सुखरुपणे झाडावरुन खाली उतरवण्यासाठी भाजपाचे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या तरूणाची समजूत काढत त्याच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी त्या शेतकऱ्याला पोलिस आणि सुरक्षा रक्षकाच्या मदतीने झाडावरुन खाली उतरवले. त्यानंतर अग्रवाल यांनी त्या तरूणाची भेट महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी घालून देत त्याच्या मागण्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी मदत केली.
सेंद्रिय शेतीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी राज्य शासनाचा निषेध करीत तरूण शेतकरी इंजि. ईश्वर शिवाजी शिंदे (रा.खापर जि. बीड) या तरुणाने विधान भवनासमोरील वडाच्या झाडावर चढून हातात तिरंगा ध्वज घेत लक्षवेधक आंदोलन सुरु केले. यामुळे विधान भवनातील सुरक्षा रक्षकांसह पोलिसांची ताराबंळ उडाली. ईश्वर शिंदे याला झाडावरुन खाली उतरवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. मात्र बीड जिल्ह्यातील तो तरूण आक्रमकपणे घोषणा देत झाडावरुन उतरण्यास तयार नव्हता. यावेळी धुळे शहर विधानसभेचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला झाडावरून खाली आणण्यासाठी पोलिसांनी अग्नीशामक दलाची मदत मागवली. उचं शिडी लावून काही जवान झाडावर चढले. व त्या तरूणाची समजूत काढून खाली येण्यास सांगू लागले. मात्र तो कुणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
त्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी एका उंच क्रेनच्या सहाय्याने झाडावर जात त्या तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्या तरुणाशी संवाद साधला. तरुणाने आपली मागणी अग्रवाल यांच्यासमोर मांडली. आपण अनेक वर्षापासून बीड जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत असून आपल्या मागण्यांची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय उरला नसल्याचे त्याने सांगितले. त्यावेळी आग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देत तुझी मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. व त्याला झाडावरून खाली येण्याची विनंती केली. त्यानंतर त्या तरूणाने झाडावरुन खाली उतरण्याची तयारी दर्शवली.
आमदार अनुप अग्रवाल यांनी त्या तरुण शेतकर्याची नंतर विधान भवनाच्या आवारातच राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट घालून दिली. यावेळी त्या तरुणाने महसूलमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. त्याने शासन दरबारी केलेले अर्ज, निवेदने, विनंत्या याची कागदपत्रे दाखवली. तसेच आपली मागणी पूर्ण करण्याची विनंती केली. त्यानंतर जीव धोक्यात घालून असे आंदोलन करू नका. तुमची मागण्यांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.