

धुळे: शिरपूर तालुक्यातील थाळनेर शिवारात झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे रब्बी हंगामातील पीक आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेला घास अचानक या अवकाळी मुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी होते आहे.
शिरपूर तालुक्यातील थाळनेर, नागेश्वर बंगला, भाटपुरा, अहिल्यापुर, अजनाळ, तरडी आदी भागामध्ये अचानक सायंकाळी उशिरा पावसाळी वातावरण तयार झाले. काही क्षणातच मोठ्या प्रमाणावर गारपीट सुरू झाली. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे तसेच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे रब्बी हंगामातील मका, गहू आणि ज्वारीचे पीक जमीन दोस्त झाले आहे. तर मोठ्या प्रमाणावर पपई आणि केळीची बाग लावण्यात आली आहे. या बागांचे देखील नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून त्याचा परिणाम रहदारीवर झाल्याचे देखील वृत्त आहे.
या तालुक्यात खरीप हंगामात देखील अशाच पद्धतीने पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामात पल्लवीत झाल्या होत्या. मात्र निसर्गाच्या या रौद्र तांडवामुळे रब्बी हंगामाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा, अशी मागणी होते आहे.