

धुळे : एकाच पक्षाचे नगराध्यक्ष व सर्व 26 नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळालेल्या दोंडाईचा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांच्यासह सर्व 26 नगरसेवकांनी मंगळवार (दि.30) रोजी आज नगरपालिकेच्या सभागृहात विधीवत पदभार स्वीकारला.
यावेळी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, लोकनेते सरकारसाहेब रावल, मंत्री रावल यांच्या सौभाग्यवती सुभद्रादेवी रावल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. धरती देवरे, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत नगरपालिकेत प्रवेश करण्यात आला. नगरपालिकेतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांच्या स्वागतासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. पालिका इमारत फुलांनी सजविण्यात आली होती.
अध्यक्षांच्या दालनात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर मंत्री जयकुमार रावल यांनी नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल यांना अधिकृतपणे खुर्चीवर विराजमान केले.
यावेळी गटनेते निखिल जाधव, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह मुकेश देवरे, रविना कुकरेजा, सरलाबाई सोनवणे, शेख शिबान अहमद, अक्षय चव्हाण, सुपीयाबी बागवान, कल्पनाबाई नगराळे, शेख नबु पिंजारी, विजय पाटील, भारती मराठे, वैशाली कागणे, सुभाष धनगर, देवयानी रामोळे, चतुर पाटील, नरेंद्र गिरासे, राणी अग्रवाल, वैशाली महाजन, अपूर्वा चौधरी, भावना महाले, रविंद्र देशमुख, सरजू भिल, सुवर्णा बागुल, भरतरी ठाकूर, ललिता गिरासे आदी नगरसेवक उपस्थित होते.
विकास करून इतिहास घडविण्याचा संकल्प – मंत्री जयकुमार रावल
एकाच पक्षाचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही देशातील दुर्मिळ घटना असून यामुळे दोंडाईचा नगरपालिकेने इतिहास घडविला आहे. मात्र या ऐतिहासिक यशाबरोबरच नगरसेवकांवर मोठी जबाबदारीही आली आहे. जसा बिनविरोध निवडीचा इतिहास घडविला, तसाच येत्या पाच वर्षांत सर्वांगीण विकास करून नवा इतिहास घडवावा, असे आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.