

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील हतनूर येथील एका शेती साहित्य विक्री केंद्राला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंदखेडा सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून अग्निशमन दल वेळेवर पोहोचले नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे.
हतनूर येथे जय श्रीकृष्ण ऍग्रो नावाने सिंचनाचे साहित्य वितरित करणारे केंद्र आहे. या केंद्रात रात्री उशिरा सिंचनाचे साहित्य घेऊन मिनी डोअर पोहोचली. ही गाडी गोदामा जवळ लावून सर्वजण घरी परत गेले. मात्र त्यानंतर अचानक गोदामाला आग लागल्याची माहिती या केंद्राची संचालक विनोद पाटील यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी गोदामाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने भीषण स्वरुप धारण केले होते.
यावेळी गावकऱ्यांनी जीव धोक्यात घालून गोदामातील काही साहित्य वाचवण्याचा प्रयत्न केला. तर शिंदखेडा येथे अग्निशमन दलाला देखील ही सूचना देण्यात आली. मात्र तब्बल दोन तास उशिराने अग्निशमन दल पोहोचले तोपर्यंत गोदामातील सर्व माल खाक झाला असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात मंडळ अधिकारी तसेच तहसीलदार यांनी तातडीने पंचनामा करून मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.