

Mumbai Agra Highway Bike Crash
धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या आराम बसच्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे तालुक्यातील वरखेडे येथील रहिवासी सिंधुबाई पाटील (वय 83) या सुरत येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी गावातीलच निलेश संभाजी पाटील (वय 39) आणि सुभाष लोटन धनगर (वय 43) हे दुचाकीवरून सोबत जात होते.
दरम्यान, त्यांची दुचाकी मुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडे फाट्याजवळ पोहोचताच एआर-11 बी-9191 क्रमांकाच्या भरधाव आराम बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी बसच्या पुढील भागात अडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह वरखेडे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघाताचे विदारक स्वरूप पाहून उपस्थित नागरिकही हादरून गेले. त्यानंतर तिघांचे मृतदेह शववाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात आराम बस चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.