धुळे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने बुधवार (दि.25) रोजी सकल मराठा समाजाने मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यानंतर महामार्गावरील रहदारी सुरळीत करण्यात आली आहे.
मराठा समाजाला 50 टक्के अंतर्गत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात जेलरोड मार्गावर सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र महाराष्ट्र सरकार जरांगे यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्याने बुधवार (दि.25) रोजी धुळ्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील शेकडो कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने धुळ्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांचा तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. मनोज जरांगे पाटील गेल्या 9 दिवसापासून मराठा समाजाला 50 टक्के च्या आत ओबीसी मधुन आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण करीत आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत खूपच खालावली आहे. त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा समाज प्रचंड आक्रमक झालेला पहावयास मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलन यांनी दिला आहे. आंदोलकांनी धुळे शहरालगत हॉटेल नालंदाजवळ मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला.
आंदोलनामधे भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, विकास बाबर, संदीप पाटोळे, आबा कदम, दीपक रौंदळ, प्रफुल माने,कैलास वाघारे, हेमंत भडक, श्रीरंग जाधव, मनोज ढवळे,किशोर वाघ , भैय्या शिंदे,सुरेश पवार, भास्कर चौधरी , कैलास मराठे,मनोज रुईकर, सचिन नागणे, धीरज मराठे, विक्रम काळे, सुनील वरपे, रवींद्र नागणे, मनोहर जाधव, केतन भामरे, बाळासाहेब ठोंबरे, अनिल बगदे, वैभव पाटील, हेमंत चव्हाण, प्रभाकर वाघ, मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावरील रहदारी ठप्प झालेली आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना आझाद नगर पोलीस ठाण्यात रवाना केले. यानंतर रहदारी सुरळीत करण्यात आली आहे.