पिंपळनेर, जि.धुळे : साक्री तालुक्यात पंधरवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मेंढपाळांच्या शेकडो मेंढ्या दगावल्या आहेत. या मेंढ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक व मेंढपाळ बांधवांनी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ समाज वास्तव्यास असून मेंढीपालन या प्रमुख व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो;परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे या समाजातील अनेक लोकांच्या मेंढ्या व जनावरे दगावले आहेत. पावसामुळे या भागातील प्रत्येक मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. या कुटुंबांना मदत मिळावी, यासाठी मेंढपाळ राहत असलेल्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन पावसामुळे दगावलेल्या मेंढ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मेंढपाळांनी धुळे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरक यांच्य नेतृत्वाता केली आहे.
दरम्यान,यासंदर्भात निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे.