

धुळे : राज्याचे मंत्री जयकुमार रावळ यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी रावळ यांच्याबाबत भ्रष्टाचार आणि गैर प्रकाराची पाच प्रकरणे बाहेर काढली असून या सर्व प्रकरणांची मंत्री रावळ यांचा संबंध असल्याचा आरोप यापूर्वी केला आहे. याच संदर्भात शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मंत्री रावळ यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे तसेच या सर्व आर्थिक गुन्ह्यांचा तपास ईडीकडे सुपूर्द करावा, अशी मागणी केली आहे.
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. यात भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची शेती हडप करण्याच्या प्रकारापासून रावळ बँकेच्या घोटाळा तसेच अशी अनेक प्रकरणे पत्रकार परिषदेतून मांडली. या सर्व प्रकरणांचा मंत्री रावळ यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मंत्री रावळ यांच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील मंत्री जयकुमार रावळ यांच्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रातील अनेक सहकारी व नागरी बँकांचे वाटोळे झाले . त्यात सामान्य ठेवीदारांचे अतोनात नुकसान झाल्याचे रोज समोर येत आहे. जॉर्ज फर्नाडिस यांनी स्थापन केलेल्या न्यू इंडिया बैंकेतही अशाच मनमानी, बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वाटप झाल्याने हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले. त्यातील आरोपी मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत.
दोंडाईच्या जनता सहकारी बँक (कै. दादासाहेब रावल जनता सरकारी बैंक) या बँकेत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली. बिगर गॅरंटीचे कर्ज वाटप, कोणतीही गॅरंटी न घेता ९८ कोटींचे कर्ज वाटप आपल्या जवळच्याच नातेवाईकांना बँकेच्या राजकीय मालकांना दिले. इतकेच नव्हे तर बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेर गुजरातमधील नातेवाईकांनाही कोट्यवधी रुपये दिले. हे गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी कृत्य मंत्रिमंडळातील जयकुमार रावळ यांनी केले. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास राजकीय दबावामुळे होऊ शकला नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना झाली व चौकशी अहवालानुसार मंत्री जयकुमार रावळ हे बँक घोटाळा प्रकरणात आरोपी क्रमांक तीन आहेत. असे एसआयटीचा अहवाल सांगतो.
या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून रावळ हे इतर 55 आरोपींसह फरारी आहेत. याच काळात यातील काही आरोपींनी 'एसआयटी' तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आपल्याकडून म्हणजेच तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा तपास 'सीआयडी'कडे सोपवण्यास भाग पाडले. बँक लुटीच्या भ्रष्ट प्रकरणात मंत्री रावळ हे बुडाले आहेत. जनतेच्या पैशांची लूट करून सत्ता भोगणे हा भयंकर अपराध आहे. रावळ यांचे वर्तन हे लोकप्रतिनिधीस शोभणारे नाही. अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असले तर महाराष्ट्राच्या जनतेने कोणता आदर्श बाळगावा?, रावळ यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे देता येतील. पण खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची 26 एकर जमीन हडपणाचा रावळ यांचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला आहे. हे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. सामान्य जनतेलाही सोडले नाही व राष्ट्रपतीनांही सोडले नाही. याचे इनाम म्हणून हे महाशय मंत्रीपदी आहेत काय?,
मुंबईतील पीएमसी बँकेतील घोटाळ्यांविरोधात भाजप रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून प्रकरणाचा तपास 'ईडी'कडे सोपवला होता. जयकुमार रावळ यांनी 'रावळ' बँकेत केलेला गुन्हा त्याच पध्दतीचा आहे. पण ते भाजप, गोटात असल्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे. रावल यांनी बँक लुटली. सामान्यांच्या पैशांची अफरातफर करूनही ते मोकळे व भाजपचे प्रिय कसे?. जयकुमार रावल यांनी बँकेच्या पैशांची अफरातफर करून पीएमएलए कायद्यांतर्गत येणारा मनी लॉण्डरिंगचा गुन्हा केल्याने हे संपूर्ण प्रकरण निष्पक्ष तपासासाठी 'ईडी'कडे सोपवण्यात यावे व शेकडो बँक खातेदार व ठेवीदारांना न्याय द्यावा.
असा प्रश्न या पत्राच्या माध्यमातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.