

पिंपळनेर : 'त्या मुलीशी लग्न करू नका, माझे तिच्याशी प्रेमसंबंध आहेत', असा फोन करून तरुणीचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार साक्री तालुक्यातील रायपूर येथे घडला. या प्रकाराचा जाब विचारल्याच्या रागातून संबंधित तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायपूर येथील एका तरुणीचे लग्न ठरले होते.मात्र,गावातील एका तरुणाने तिच्या होणाऱ्या जावयाला फोन करून तरुणीबाबत बदनामीकारक माहिती दिली. तसेच तिच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचे सांगून ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी संबंधित तरुणाकडे याबाबत जाब विचारला. त्याचा राग आल्याने संबंधित तरुणासह त्याच्या नातेवाईकांनी गावातील मारुती मंदिराजवळ फिर्यादीच्या मुलासह त्याच्या पत्नीवर हल्ला केला. या हल्ल्यात कुऱ्हाडीचा वापर करण्यात आल्याने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्याला,तर त्याच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली. जखमींवर उपचार करण्यात येत असून,या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भिवा कृष्णा कारंडे,मधू भिवा कारंडे,पोपट भिवा कारंडे,नागो कृष्णा कारंडे,उत्तम नागो कारंडे,पिंटू नागो कारंडे,दशरथ लहानू कारंडे,संदीप उत्तम कारंडे,दिनेश लुका कारंडे,विकास गोरख कारंडे, प्रकाश गोरख कारंडे,समाधान बापू थोरात व सुरेश लुका कारंडे यांच्याविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.