

धुळे | शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव नाही, भाजपा महायुती सरकारने आश्वासन देऊनही शेतकर्यांचे कर्ज माफ केले नाही, त्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने शेतीमालाला भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आज धुळ्यात तालुका काँग्रेसने निदर्शने केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी आज धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा महायुती सरकारला शेतकर्यांच्या प्रश्नांची आठवण आणि जाणीव निर्माण करुन देण्यासाठी व शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. क्यूमाईन क्लब समोर धुळे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन झाले. यावेळी कॉग्रेस चांगली आक्रमक झालेली पहायला मिळाली. आंदोलनात निषेध व्यक्त करतांना काँग्रेस पदाधिकार्यांनी भाजपा महायुती सरकारवर टिकेची तोफ डागली. यावेळी काँग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले की, राज्यातील भाजपा महायुती सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले असून निवडणूकीत खोटी आश्वासने देवून शेतकर्यांची फसवणूक केली. कापूस,सोयाबीनला कवडीमोल भाव सरकार देत आहे. कांदा तसेच इतर पिकांना हमी भाव नाही. शेतकर्यांना कृषी पंपाना सुरुळीत विज पुरवठा नाही, कृषी पंपाचे विज बिल माफ केले नाही. शेतकर्यांकडे तूर उपलब्ध असतांना केंद्र सरकार ऑस्ट्रेलियाहून तूर आयात करीत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कोणत्याही पिकाच्या मालाला रास्त भाव नाही, परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. निवडणूकीत शेतकर्यांचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन भाजपा महायुती सरकारने दिले होते. म्हणून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकर्यांचे कर्जमाफ करावे आणि शेतकर्यांच्या मालाला हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनात करण्यात आली.
यावेळी आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, माजी सभापती गुलाबराव कोतेकर, सुतगिरणीचे व्हा.चेअरमन प्रमोद जैन ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, भटक्या विमुक्त काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, माजी सभापती गुलाबराव पाटील, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे, खरेदी विक्रीचे व्हा.चेअरमन पोपट शिंदे, कृषीभूषण भिका पाटील, खरेदी विक्रीचे संचालक पंढरीनाथ पाटील,जि.प.सदस्य अरुण पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील, माजी संचालक राजेंद्र भदाणे, संचालक बापू खैरनार, ज्येष्ठ नेते डॉ.दत्तात्रय परदेशी, युवा नेते प्रविण चौरे साक्री, जिल्हा काँग्रेस ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष मधुकर पाटील, माजी सरपंच संभाजी गवळी, संचालक एन.डी.पाटील, माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी उपसरपंच हिरामण पाटील, माजी सरपंच संजय देसले, सरपंच पांडूरंग मोरे,विजय पाटील, दत्तू पाटील,युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे, शिवाजी अहिरे, आदी उपस्थित होते.