

धुळे : येथील जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण १७४४२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. २२ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करण्यात आल्याची माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदिप वि. स्वामी यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हयात धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले. लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. न्यायालयातील प्रलंबित ५९०० प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे वादपूर्व ७५५४२ प्रकरणे ज्यामध्ये ग्रामपंचायत, विज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीचे थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती. प्रकरणांपैकी ४३१ प्रलंबित प्रकरणे व १७०११ दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण १७,४४२ समोपचाराने निकाली निघाली. लोकअदालतमध्ये २२ कोटी ४८ लाख ७७ हजार रूपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली. लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, माधुरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
धुळे जिल्हात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कौटुंबिक वादातील प्रकरणामध्ये ९ जोडपे पुन्हा एकत्र नांदण्यास गेले. तसेच मोटार अपघात प्रकरणापैकी १३७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघूप रक्कम रू. १० कोटी ५ लाखापेक्षा जास्त रक्कम पक्षकारांना वसुल करण्यात आली.