धुळे : पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या घटनेचे स्मरण म्हणून 2004 पासून 14 जानेवारी रोजी वीर योद्धांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतीय मराठा जागृती मंच संघटनेच्या वतीने या वर्षी देखील हा कार्यक्रम पानिपत येथे होणार असून त्यासाठी पाच राज्यांमधून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. या वर्षी महाराष्ट्रातून पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रभाकर पडोळ यांनी दिली.
पानिपत येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी चार राज्यांमध्ये जनजागृती, यंदा महाराष्ट्रातून 5000 कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रभाकर पडोळ यांनी दिली.
वीर सावरकर मार्गावरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत इतिहास अभ्यासक प्रभाकर पडोळे यांच्यासह अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सचिव नामदेवराव वाघ, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष निंबा मराठे, धुळ्याचे सचिव दीपक रवंदळ, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र काळे तसेच सकल मराठा समाजाचे पदाधिकारी विनोद जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
पडोळे यांनी सांगितले की, पानिपत नजीकच्या बसताडा येथे 14 जानेवारी रोजी पानीपतच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर योद्धांना दरवर्षी श्रद्धांजली अर्पण केली जाते. गेल्या 2004 पासून महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी हजेरी लावतात. यावर्षी देखील पानिपत येथे जाण्यासाठी जळगाव येथील नामदेवराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर कार्यक्रम स्थळी जाण्याची व्यवस्था करून दिली आहे. यासाठी रेल्वेचे आसन नियोजन करण्यात आले असून राज्यातून किमान 5000 कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमासाठी नियोजन केले जात असल्याची माहिती देण्यात आली.
पानिपत युद्धाच्या तिसऱ्या लढाई मधून वाचलेल्या व हरियाणा येथेच स्थायिक झालेल्या मराठा युद्धाच्या वंशजांना 250 वर्ष रोड मराठा या नावाने ओळखले जात होते. पण या समाजाचे नेते तथा माजी सनदी अधिकारी वीरेंद्र मराठा यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. वसंतराव मोरे यांनी रोड समाजाचे दहा वर्ष संशोधन केले. त्यांना मराठा ही मूळ ओळख मिळवून दिली. पण हे सर्व करीत असताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पानिपत येथील मराठा जागृती मंचच्या माध्यमातून 21 वर्षांपासून हरियाणा येथे मराठा शौर्य दिवस साजरा केला जातो. पानिपत हा विषय आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे पानिपतच्या मोहिमेसाठी सर्वांनी आपला सहभाग तेथे प्रत्यक्ष जाऊन नोंदवावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. पानिपतचे राष्ट्रीय स्वयंसेवक या देशातील सात राज्यांमध्ये स्वखर्चाने पानिपतची चळवळ घरोघर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.